महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ फेब्रुवारी । भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज कोट्यवधी नागरिक रेल्वेने प्रवास करतात. प्रवासादरम्यान बरेच जण काहीही विचार न करता चिप्स, इतर खाण्यापिण्याचे रॅपर किंवा इतर कोणतीही वस्तू रेल्वे स्टेशनवर टाकतात. तुम्हीही असेच करत असाल तर सावध व्हा. रेल्वे स्थानकावर घाण पसरवणाऱ्यांवर रेल्वे कारवाई करणार आहे. एवढेच नाही, तर या सवयीमुळे तुमच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल होऊन तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते.
राष्ट्रीय हरित लवादाने आदेश (एनजीटी आदेश) जारी केले आहेत. हे आदेश IRCTC ने सर्व स्टेशन प्रभारींना पाठवले आहेत. त्यामुळे कोणताही विचार न करता रेल्वे स्थानकावर घाण पसरवू नका. कचऱ्याच्या बॉक्समध्येच कोणतेही रॅपर टाका. जेणेकरून स्थानकावर घाण पसरणार नाही. रेल्वेच्या आवारात अनेक प्रवासी अस्वच्छता पसरवताना दिसतात. काहीवेळा हे रॅपर्स जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांमध्येही अडकतात. त्यामुळे चाके जॅम होऊन अपघाताचा धोका वाढतो.
एनजीटीने नुकतेच रेल्वेला त्यांची स्थानके स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर रेल्वेने नियम बदलून फलाटावर घाण पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवण्याची तयारी केली आहे. आतापर्यंत केवळ दंड वसूल करून संबंधित व्यक्तीला सोडले जात होते. रेल्वे ट्रॅक स्वच्छ ठेवण्यासाठी धावते पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक वेळोवेळी सरप्राईज चेकिंग करेल. यासोबतच झोनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर रेल्वेच्या आदेशानंतर अनेक स्थानकांवरही ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
याशिवाय रेल्वे रुळाच्या बाजूला असणारे असलेल्या कारखान्यांनी रेल्वेच्या परिसरात घाण पसरवल्यास रेल्वे गुन्हा दाखल करणार आहे. अशांची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यांचे फोटो काढले जातील आणि व्हिडिओही बनवले जातील. जेणेकरून तो पुरावा म्हणून सादर करता येईल. रुळाच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांसमोर घाण आढळून आल्यास त्यांच्याकडूनही रेल्वे दंड वसूल करेल.