महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० फेब्रुवारी । ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या ऐतिहासिक टेस्ट सीरिज विजयाचा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हिरो होता. आता वर्षभरानं परिस्थिती बदलली आहे. खराब फॉर्ममुळे त्याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले. विराट कोहलीनं (Virat Kohli) कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भावी कॅप्टनच्या शर्यतीमधून तो बाहेर आहे, इतकंच नाही तर त्याची टीममधील जागा देखील धोक्यात आहे. अजिंक्यनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मिळालेल्या विजयावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
टीम इंडियानं मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अॅडलेडमध्ये झालेल्या टेस्टमध्ये लाजीरवाणा पराभव पत्काराला. या टेस्टनंतर विराट कोहली बाळाच्या जन्मासाठी भारतामध्ये परतला. विराटच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे टीमचा कॅप्टन होता. अजिंक्यच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं त्यानंतर झालेली मेलबर्न टेस्ट जिंकली. अजिंक्यनं त्या टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली होती. त्यानंतर भारताने ब्रिस्बेनमध्येही टेस्ट जिंकत सीरिज 2-1 या फरकानं जिंकली.
अजिंक्य रहाणेनं ‘बॅकस्टेज विथ बोरिया’ या कार्यक्रमात सांगितलं की, ‘मी ऑस्ट्रेलियात कॅप्टन होतो. मी त्यावेळी काही निर्णय घेतले. त्याचे श्रेय इतरांनी घेतले. मी तिथं काय केलं हे मला माहिती आहे. मला ते कुणाला सांगण्याची गरज नाही. त्याचं श्रेय घ्यावं हा माझा स्वभाव नाही. काही अशा गोष्टी होत्या की ज्याचा निर्णय मी मैदानात आणि ड्रेसिंग रूममध्ये घेतला. त्याचे श्रेय दुसऱ्याने घेतले. माझ्यासाठी सीरिज जिंकणे सर्वात महत्त्वाचे होते. त्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. मी असं केलं, मी तसं केलं हे मीडियाला सांगण्यात आले. त्यांनी काहीही म्हंटलं असलं तरी मी काय निर्णय घेतले हे मला माहिती आहे,’ असे अजिंक्यने स्पष्ट केले.
अजिंक्यनं या मुलाखतीमध्ये टेस्ट करिअर संपले असल्याच्या चर्चेवरही उत्तर दिलं. ‘माझं करिअर संपलं अशी लोक चर्चा करतात त्यावर मला हसू येते. खेळ व्यवस्थित समजतो ती मंडळी या प्रकारे बोलणार नाहीत. ऑस्ट्रेलियात किंवा त्यापूर्वी काय झाले हे प्रत्येकाला माहिती नाही. मी देखील टेस्टमधील विजयात योगदान दिले आहे. ज्या लोकांचं खेळावर प्रेम आहे, ते नेहमीच समंजसपणे बोलतील.’ असे अजिंक्यने यावेळी सांगितले.