महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २० फेब्रुवारी । राज्यात कोरोनाची तिसरी लाट कमी झाली. नवीन बाधितांची संख्याही नियंत्रणात आहे. त्यामुळे मार्चमध्ये राज्यातील निर्बंध मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. शिवाय केंद्र शासनाकडूनसुद्धा राज्याला निर्बंध कमी करण्यासंदर्भात पत्र आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी (ता.१९) येथे पत्रकारांना दिली.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ‘‘राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर रोज ४८ हजारांपर्यंत कोरोना रुग्ण आढळून येत होते. परंतु, आजघडीला रोज दोन हजारांपेक्षाही कमी रुग्ण राज्यात आढळून येत आहेत. शिवाय कोरोनामुळे होणारे मृत्यूही थांबले आहेत. राज्यात लसीकरणसुद्धा वेगाने झाले असून, आतापर्यंत ९३ टक्के टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
६७ ते ६८ टक्क्यांपर्यंत कोरोना लसीकरणाचा दुसरा डोसही पूर्ण झाला आहे. शिवाय १५ व १८ वयोगटातील मुलांचे ५७ टक्के लसीकरण झाले आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम हा निर्बंध कमी करण्यावर होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कलदेखील निर्बंध कमी करण्याचा आहे; तसेच केंद्राकडूनही कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पत्र आले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात परिस्थिती पाहून हॉटेल, विवाहा सोहळा, नाट्यगृह, सिनेमागृह आदी ठिकाणचे निर्बंध मोठ्या प्रमाणावर कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.