महाराष्ट्र 24 ऑनलाईन; मुंबई : महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतच चाललेली आहे. राज्यात सध्या कोरोना हा तिसऱ्या टप्प्यात असून केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केलेला आहे. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा आता १३४ वर पोहचला आहे. असं असतानाच गरज पडल्यास ठाकरे सरकार केंद्राकडे लष्कराची मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यामध्ये लष्कराची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणीही राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज असून आज (ता.२७) शुक्रवारी कोरोनाविरोधातील मोहिमेला भारतीय लष्कराने ऑपरेशन नमस्ते नाव दिले आहे.
तत्पूर्वी, लष्काराने मानेसर, जैसलमेर आणि जोधपूर येथे लष्कराने क्वारंटाइन केंद्रे उभारली आहेत. चीन, इटली आणि इराणहून आणलेल्या भारतीयांना इथे ठेवण्यात आले होते. आणखी चार ठिकाणी क्वारंटाइन सेंटर उभारण्यात येणार आहेत.
दरम्यान, युरोपमधील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव असणाऱ्या भागांमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. इटली, स्पेन आणि फ्रान्समधील काही भागांमध्ये स्थानिक पोलिसांबरोबरच लष्कराच्या जवानांना नियुक्त करण्यात आलं आहे. कोरोनाचा धोका असल्याने देशातील सरकारने जारी केलेल्या लॉकडाउन आणि संचारबंदीदरम्यान कोणाही सार्वजनिक ठिकाणी भटकू नये यासंदर्भातील खबरदारी घेण्याची जबाबदारी काही देशांमध्ये लष्करावर टाकण्यात आली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही गरज पडल्यास ठाकरे सरकार लष्कराला पाचारण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.