टी-२० वर्ल्डकपसाठी संघ जवळपास निश्चित; राहुल द्रविड यांचा मोठा खुलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ फेब्रुवारी । ‘आगामी टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाच्या बांधणीचे कोणतेही सूत्र ठरलेले नाही. मात्र, वर्ल्ड कपसाठी जो संघ अपेक्षित आहे, त्याबाबतचे माझे आणि कर्णधार रोहित शर्माचे विचार, संकल्पना स्पष्ट आहेत,’ असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले.

टी-२० वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार आहे. गेल्या वर्षी यूएईत झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताला साखळीतूनच बाहेर पडावे लागले. त्या वेळी रवी शास्त्री भारताचे प्रशिक्षक होते. यानंतर या पदासाठी द्रविड यांची निवड झाली. आता या वर्ल्ड कपमध्ये चमक दाखविण्यासाठी भारताला सर्वोत्तम संघ मैदानात उतरावा लागणार आहे. त्यासाठी आताच संघ बांधणी करणे गरजेचे आहे. याबाबत द्रविड म्हणाले, ‘माझ्यासह निवड समिती, संघव्यवस्थापन आणि कर्णधार रोहित आमच्यासमोरील संघाचे चित्र स्पष्ट आहे. अर्थात, यासाठी कुठलाही फॉर्म्युला तयार करून ठेवलेला नाही. समतोल संघ डोळ्यासमोर आहे. त्यादृष्टीनेच संघ बांधणी सुरू आहे. या खेळाडूंवर अतिरिक्त कार्यभार येऊ नये, यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.’ ऑस्ट्रेलियात खेळताना कुठल्या प्रकारचे कौशल्य अपेक्षित आहे, याची आम्हाला कल्पना आहे. तेव्हा संघातील स्थान निश्चित करण्यासाठी आम्ही प्रत्येकाला पुरेशी संधी देणार असल्याचेही द्रविड यांनी सांगितले.

भारताने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३-० असे निर्भेळ यश मिळवले. यानंतर विंडीजलाही ३-० असे पराभूत केले. आता भारत-श्रीलंकेदरम्यान तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. यातील पहिली टी-२० लढत २४ फेब्रुवारीला होईल. भारताने काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, आवेश खान यांना वर्ल्ड कपसाठी भारतीय संघातील स्थानासाठी आपला दावा सिद्ध करता येईल. याबाबत बोलताना द्रविड म्हणाले, ‘करोनाकाळात खेळणे सोपे नाही. अर्थात, संघ निश्चितीसाठी आम्ही काही अशी वेळ निश्चित केलेली नाही. आम्हाला केवळ पंधरा खेळाडूंपर्यंत मर्यादित राहायचे नाही. आम्हाला प्रत्येक खेळाडूला पुरेशी संधी द्यायची आहे. जेणेकरून वर्ल्ड कपपूर्वी खेळाडूंकडे १०-१५-२० सामन्यांचा अनुभव असेल. ज्यामुळे रोहितलाही खेळाडूंबाबत कल्पना येईल. म्हणजे कुठल्या क्रमांकावर कुठल्या फलंदाजाला पाठवायचे, कोणाला गोलंदाजी द्यायची, याबाबत स्पष्टता येईल; तसेच काही खेळाडूंना दुखापत झाली, तरी आम्हाला दुसरी फळी तयार ठेवावी लागेल.’

द्रविड म्हणाले…

– खेळाडूंची पारख एक मालिका किंवा एका खराब सामन्याद्वारे केली जाणार नाही. मग तो ऋतुराज असो की आवेश खान.

– ईशान किशनची निवड त्याच्या क्षमतेनुसार केली गेली आहे. मात्र, प्रत्येकाला ठरावीक सामने खेळायला मिळतील, असे काही ठरवलेले नाही.

– आतापर्यंत प्रत्येक खेळाडूची निवड ही त्याच्या कामगिरीवरूनच केली गेली आहे. त्या खेळाडूंना पाठिंबा देण्याची गरज आहे.

– वेंकटेश अय्यर आयपीएलमध्ये सलामीला येतो. मात्र, त्याची भारतीय संघातील भूमिका काय असेल, याबाबत आमच्यात स्पष्टता आहे.

– भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारून नुकतेच (१७ फेब्रुवारी) शंभर दिवस पूर्ण झाले. या शंभर दिवसांत खूप काही शिकायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *