महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला २६ मार्चपासून चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्या लढतीने सुरूवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंट्स हे दोन नवीन संघ दाखल झाल्यामुळे लीगची रचना बदलली आहे.
दहा संघांची प्रत्येकी पाच अशा दोन संघात विभागणी केली गेली आहे. प्रत्येक संघ आपापल्या गटातील अन्य चार संघांविरुद्ध प्रत्येकी दोन व दुसऱ्या गटातील एका संघासोबत दोन व उर्वरित संघांसोबत एक असे एकूण १४ सामने खेळणार आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात साखळी फेरीच्या ७० लढती खेळवल्या जाणार आहे. पण, आता BCCI ने आयपीएल २०२२ त आणखी ट्विस्ट आणले आहेत.
कोरोना परिस्थितीमुळे एखादा संघ मैदानावर ११ खेळाडू उतरवण्यास असमर्थ राहिल्यास, त्या सामन्याची नवीन तारीख ठरवली जाईल. पण, जर नव्या तारखेत तो सामना खेळवणे शक्य न झाल्यास अंतिम निर्णय हा तांत्रिक समिती घेईल, हे बीसीसीआयने स्पष्ट केले.
बीसीसीआयने सांगितले की, कोरोनामुळे एखादा संघ मैदानावर १२ खेळाडू ( त्यात ७ भारतीय आवश्यक + १ राखीव ) उतरवण्यात असमर्थ राहिल्यास तो सामना स्थगित केला जाईल. तो सामना दुसऱ्या तारखेला खेळवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण ते शक्य न झाल्यास तांत्रिक समिती अंतिम निर्णय घेईल आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल व सर्वांना मान्य करावा लागेल.”
शिवाय Marylebone Cricket Club ने नुकत्याच सुचवलेल्या बदलांपैकी एक नियम आयपीएलमध्ये राबवण्यात येणार आहे. झेल उडाल्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडच्या खेळाडूने खेळपट्टी निम्मी क्रॉस केली असली तरी नवा येणारा फलंदाजच स्ट्राईक घेईल. पण, जर तो षटकाचा अखेरचा चेंडू असेल तर नॉन स्ट्रायकरवरील फलंदाज स्ट्राईक घेईल.
सुपर ओव्हरमध्येही टाय झाल्यास…
प्ले ऑफ व फायनल लढतीचा निकाल सुपर ओव्हरमध्येही टाय लागल्यास अन् वेळेअभावी आणखी एक सुपर ओव्हर शक्य नसल्यास लीगमध्ये सर्वाधिक गुण कमावणाऱ्या संघाला विजयी घोषित केले जाईल.