महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । महाराष्ट्राच्या राजकारणाला (Maharashtra Politics) आणखी एक नवा ट्विस्ट देणारी एक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कॅबिनेटमधील केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठी मागणी केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबतची आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून मागणी करणार असल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी थेट अशाप्रकारची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मोठा संघर्ष बघायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा गैरसमज आहे की भाजपचं सरकार दिल्लीमध्ये आहे. सरकार ईडीला सांगून आमच्यावर कारण नसताना कारवाई करायला लावत आहे, अशी त्यांची तक्रार आणि भावना आहे. पण ईडीसोबत आमचा काही संबंध नाही, संबंधित यंत्रणा केंद्राच्या अंतर्गत असली तरी त्यांना स्वतंत्र अधिकार आहे. त्यांना तपासाबाबतचं स्वातंत्र्य आहे. ईडी ज्यांचा तपास करत आहेत ते किंवा ज्यांच्याविरोधात कारवाई करत आहे ते चुकीचं असेल तर त्यांनी कोर्टात जायला हवं. तसेच त्यांनी त्याबाबतचा पुरावा ईडीला द्यायला हवा”, असं रामदास आठवले म्हणाले.