महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । एकीकडं राज्यात उन्हाची काहीली वाढत असतानाच, दुसरीकं काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अरबी समुद्रामध्ये पूर्व मोसमी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं कोकण, गोव्यासह पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिह्यांमध्ये दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, यावरुन महाराष्ट्रातील ऋतुचक्र बदलत असल्याचे दिसत आहे.
उद्या आणि परवा विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता असतानाच आता दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच बंगालच्या उपसागरात चक्री वादळ तयार होत आहे, त्याचा परिणाम वातावरणावर होत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अशातच कोकणाला असनी या चक्रीवादळाचा धोका असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. मात्र, कोकणाला कोणत्याही प्रकारच्या चक्रीवादळाचा धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. येत्या 2 ते 4 दिवसात कोकणला चक्रीवादळाचा धोका असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र, यामध्ये कोखमंही तथ्य नाही. त्यामुळं नागरिकांनी विनाकारन घाबरुन जाऊ नये असे प्रशासनाने सांगितले आहे.
असनी चक्रीवादळ समुद्रकिनाऱ्यावर धडकणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. मच्छिमारांना देखील खबदारी बाळगण्याचे मेसेज व्हायरल झाले होते. मात्र, कोणताही धोका नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्या कोकणातील वातावरण बघितले तर समुद्र शांत आहे. वातावरण मात्र, ढगाळ आहे. मच्छिमारांचे काम देखील सुरळीत सुरु आहे. उष्णतेत वाढ देखील झाली आहे. या वातावरणाचा आंबा आणि काजू उत्पादनावर परिणाम होणार आहे.
दरम्यान, राज्यात सध्या उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. मागच्या काही दिवसाखाली राज्यात झालेल्या अवकाळी पवसाचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. कांदा, द्राक्ष, हरभरा, गहू, मका असा पिकांचे नुकसान झाले होते.