महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । काल (24 मार्च) विधानसभेत राज्यातील सर्वपक्षीय आमदारांसाठी म्हाडाची 300 घरे देण्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयानंतर सोशल मीडियावर ठाकरे सरकारवर एकच टीकेची झोड उठवली जात आहे. या निर्णयावर मनसे आमदार राजू पाटील यांनीही नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. कशासाठी आमदारांना मोफत घरे ? असा सवाल करत घोषणा तुम्ही करता, पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा 200 युनिट सर्वसामान्यांना मोफत वीज द्या आणि जनतेचे आशीर्वाद मिळवा, असे राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सर्वपक्षीय आमदारांना राज्य सरकारने मोठी भेट दिली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत राज्यातील ग्रामीण भागांमधून मुंबईत येणाऱ्या आमदारांसाठी गोरेगावमध्ये 300 घरं बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली. ज्या आमदारांची मुंबईत घरे नाहीत, जे शहरातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नाहीत आणि मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्राच्या बाहेरील आहेत, असे आमदार राज्य सरकारच्या या योजनेचे पात्र लाभार्थी असतील, असे आव्हाड यांनी सांगितले.
लोकांच्या घरांचा प्रश्न आणि लोकप्रतिनिधी यांच्या घराचाही प्रश्न आहे. आमदारांना घरेही मिळणार आहेत. 300 घरे आमदारांसाठी बांधणार आहोत, सर्वपक्षीय आमदारांना घरे आवश्यक आहेत, आमदारांनाही चांगल्या घरांची गरज, कायमस्वरुपी घरे देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात म्हणाले.
मुंबईत म्हाडातर्फे सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरुपी 300 घरे देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. सरकार डळमळीत असल्यामुळे आमिष म्हणून आमदारांना घरे द्यायची आहेत का? सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना आमदारांना फुकटची घरे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. म्हाडाच्या लॉटरीमध्ये सर्वसामान्यांना घरे लागत नाहीत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आमदारांची कोट्यावधींची संपत्ती आहे, सोबतच काही आमदारांकडे 7 ते 8 घरे आहेत. अशातच त्यांना घरे का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.