महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ;मुंबई: ‘दिवे लावण्याच्या आवाहनामागे काहीएक श्रद्धा असू शकते. तसं केल्यामुळं करोना विषाणूवर काही परिणाम होणार असेल तर चांगलंच आहे,’ असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केलं.
करोनाची साथ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या दीप प्रज्वलनाच्या आवाहनाबरोबरच इतर अनेक विषयांवर भाष्य केलं. ‘लोकांमध्ये अनेक बाबतीत सध्या संभ्रम आहे. लॉकडाऊननंतर पुढं नेमकं काय होणार आहे, हे कोणालाही माहीत नाही. हा संभ्रम संपवणं सत्ताधाऱ्यांचं काम आहे. त्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन करायला हवं होतं. जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस व डॉक्टरांना मुस्लिम समाजातील काही लोक त्रास देताहेत. त्यांच्यावर हल्ले करताहेत. याबद्दल सरकारनं कठोर पावलं उचलायला हवीत. हे नेमकं काय चाललंय यावर मोदींनी बोलायला हवं होतं,’ असं राज म्हणाले.