महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ एप्रिल । मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. तसेच, नवाब मलिकांपासून ते शरद पवारांपर्यंत त्यांनी अनेक दिग्गज नेत्यांवर प्रहार केला. तर, मिशिदींवरील भोंग्यावरुनही आक्रमक भूमिका जाहीर केली. त्यामुळे, राज यांच्या या भाषणाची जोरदार चर्चा रंगली असून महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यावरी टीका केली आहे. दुसरीकडे भाजप नेते त्यांच्या भाषणाचं समर्थन करत आहेत. त्यातच, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी राज ठाकरेंच्या शिवतिर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचली. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कारण, राज यांनी आपल्या भाषणात भाजपवर एक शब्दही टीका केली नाही. याउलट शिवसेनेला टार्गेट केले. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप-मनसे युती होणार का, याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे, या भेटीकडे अनेकांच्या नजरा आणि कॅमेरे लागले आहेत. मात्र, या भेटीबाबत स्वत: गडकरींनी स्पष्टीकरण दिलं आहे.
”राज ठाकरेंच्या कुटुंबीयांशी माझे गेल्या 30 वर्षांपासूनचे संबंध आहेत. त्यामुळे, त्यांचे नवीन घर पाहण्यासाठी आणि त्यांच्या मातोश्रींना भेटण्यासाठी मी शिवतिर्थ या बंगल्यावर पोहोचलो. या भेटीमागे कुठलंही राजकीय कारण नाही. या भेटीकडे कौटुंबिक स्नेहभेट म्हणून बघता येईल,” असेही गडकरींनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
राज ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्यापासून ते मोहित कंबोज यांच्यापर्यंत भाजपच्या सर्वच राजकीय नेत्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचं समर्थन केलं. प्रविण दरेकर यांनीदेखील राज ठाकरे यांचं भाषण हे सर्वस्पर्शी आणि भविष्याचा वेध घेणारं होतं असं म्हटलं होतं.