Heatwave Alert! पुढचे ३ दिवस राज्यासाठी धोक्याचे, ‘या’ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ एप्रिल । राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली तर काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढत असल्याचं चित्र आहे. वारंवार होणाऱ्या हवामान बदलांमुळे बळीराजा मात्र मेटाकुटीला आला आहे. विदर्भात उन्हाचा तडाखा सुरूच असून बुधवारी अकोल्यात ४४ अंश इतके तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे अकोला सलग दुसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले.

सध्या विविध राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. यात राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भ यांचा समावेश असून यात पूर्व विदर्भातील जिल्ह्याचा समावेश नाही. मात्र, पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर इतर जिल्ह्यांना तीन दिवसांसाठी थोडाफार दिलासा मिळणार आहे.

मात्र, या तिन्ही दिवसांत अकोल्यातील उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यानंतर १० एप्रिलला अकोल्यासह बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यांतही उष्णतेची लाट असेल, असा इशारा प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. बुधवारी गडचिरोली वगळता सर्वच जिल्ह्यांचे तापमान ४० अंशांहून अधिक होते. अकोलाखालोखाल अमरावतीत ४३.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. बुधवारी नागपुरात ४०.९ अंश इतके तापमान होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *