महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई : देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. १४ एप्रिलपर्यंत देशभरामध्ये लॉकडाऊन असणार आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढणार का उठवला जाणार असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.या २१ दिवसांनंतर राज्यातल्या लॉकडाऊन उठवला जाईल का? असा प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारण्यात आला. ‘लॉकडाऊन उठवण्याबाबत कार्यपद्धती आहे. लॉकडाऊन उठवायचा किंवा वाढवायचा, याबाबत केंद्र सरकार एडव्हायजरी पाठवतं. १० आणि १५ एप्रिलदरम्यान जी परिस्थिती आहे, त्याचा अभ्यास करुन आणि केंद्राच्या एडव्हायजरीनुसार काम होईल, लॉकडाऊन शिथिल होईल, असं नाही,’ असं सूचक विधान राजेश टोपे यांनी केलं आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८०९वर गेली आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे ४९१ रुग्ण आहेत, तर ५६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण ४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचा दर हा ५ टक्के आहे, पण २.५ ते ३ टक्के मृत्यू होतील, असा आमचा अंदाज होता, अशी प्रतिक्रिया राजेश टोपेंनी दिली आहे.