महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२८ एप्रिल । यंदा फळांचा राजा हापूस आंब्याचा गोडवा महागणार आहे. निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळांनंतर अवकाळी पाऊस आणि डिझेल दरवाढीमुळे कोकणातील हापूस डझनामागे २०० रुपयांपर्यंत महागणार आहे. सलग तिसऱ्या वर्षी दरात वाढ होत आहे. यंदा उशिराने मोहोर आला, पण उष्णता वाढल्याने कच्चा आंबा गळून पडतोय. यामुळे हंगाम महिनाभर लांबणार आहे. बागायतदारांच्या मते, यंदा फार तर ३५ ते ४० टक्केच फळ बाजारात येईल. हापूसच्या दरांत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.
सिंधुुदुर्गच्या “आपलो हापूस’चे केवल खानविलकर म्हणाले, २०२० मध्ये निसर्ग, २०२१ मध्ये तौक्ते तर यंदा अवकाळी पावसाने हापूसचे नुकसान केले. ऑक्टोबरपासून पाऊस पडत होता. १ व २ डिसेंबरला सर्वदूर ३० तास पडलेला पाऊस फळबागांचे नुकसान करून गेला. ८ दिवस सोसाट्याचा वाऱ्यामुळे मोहर गळून पडला. पाण्याची पातळी वाढल्याने पुन्हा मोहोर येण्याची प्रक्रिया मंदावली. पाण्यामुळे बुरशीचे रोग बळावले. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला.
देशभरातील स्थिती अशी
वेळेआधीच प्रचंड उष्णता, काही राज्यांत वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे खूप नुकसान झाले आहे. यामुळे देशात यंदा हापूस, दशहरी आणि केसर या तिन्ही प्रमुख आंब्यांचे उत्पादन निम्म्यावरच येण्याची शक्यता आहे. सरकारी पोर्टल एगमार्गनेट अनुसार, यंदा आजवर देशातील प्रत्येक प्रकारच्या आंब्यांचे दर गतवर्षीपेक्षा सरासरी ४२% जास्त आहेत. घाऊक मंडयांत रत्नागिरीच्या आंब्याची एका पेटीचा दर (१० किलो) सध्या १,२०० ते १,५०० रुपये आहे. गतवर्षी तो ७०० ते ८०० रुपयांपर्यंत होता.