महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.२ मे। मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील विराट सभेत बोलताना राज यांनी औरंगाबादेतच नाही तर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात, नंतर उत्तर व पश्चिम महाराष्ट्र व पुढे कोकणात अशा सभा घेणार असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टीकेचे लक्ष्य करीत राज्यात जातीय विष कालवू नका, असे आवाहन केले. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना अनुल्लेखांनी मारत शहरातील आठ दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरदेखील बोट ठेवले.
४५ मिनिटांच्या सभेत ठाकरे यांनी इतिहासाचे दाखले देत संदर्भ सादर केले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांतील हवाला देत पवार यांच्यावर टीका करीत त्यांना ‘हिंदू’ या शब्दाची ॲलर्जी असल्याचा घणाघात केला. देवगिरी, पैठण या राजधान्या, खिलजीने केलेले अतिक्रमण, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना घेऊन निर्माण केलेले साम्राज्य यावर प्रकाश टाकून राज यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावर टीका केली.