महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई : कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे दहावीचा भूगोल विषयाचा राहिलेला पेपर न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावेत अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड़ यांच्याकड़े केली आहे. याबाबत येत्या ४ दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.
राज्यातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावमुळे खबरदारी म्हणून इयत्ता दहावीचा भुगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. ३१ मार्चनंतर राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून पेपर केव्हा घ्यावयाचा याचा निर्णय घेण्यात येणार होता. आता तर लॉक डाऊनमुळे व कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या रूग्ण संख्येमुळे हा पेपर सध्या घेणे शक्य सुद्धा नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये. या दृष्टिकोनातून हा पेपर रद्द करून सरासरी गुण देण्यात यावेत अशी भूमिका माजी मंत्री आ. मुनगंटीवार यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याशी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेदरम्यान केली. या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिले असे मुनगंटीवार यांनी सांगितले.