आयपीएलमध्ये फिक्सिंग?; सात संशयित पंटर्स सीबीआयच्या ताब्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ मे । तीन वर्षापूर्वीच्या आयपीएलमधील निकाल निश्चित (मॅच फिक्सिंग) केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सात संशयित पंटर्सना कथित मॅच फिक्सिंगच्या दोन स्वतंत्र प्रकरणी ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानातून मिळालेल्या माहितीच्या आधारे सन २०१९च्या इंडियन प्रीमियर लीगमधील लढती निश्चित होत असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

निकाल निश्चितीबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने देशव्यापी तपास सुरू केला आहे आणि दिल्ली, हैदराबाद, जयपूर तसेच जोधपूरमधील एकंदर सात ठिकाणी शोधमोहीम सुरू केली आहे. पाकिस्तानातून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा सट्टेबाजांचा गट आयपीएलमधील निकाल निश्चित करीत होता, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

सीबीआयने आपल्या पहिल्या एफआयआरमध्ये दिल्लीतील रोहिणी येथील दिलीप कुमार आणि हैदराबाद येथील गुर्रम वासू आणि गुर्रम सतीश यांची नावे आरोपी म्हणून नमूद केली आहेत. तर, सज्जन सिंग, प्रभूलाल मीना, राम अवतार आणि अमित कुमार शर्मा (सर्व राजस्थानचे) यांची नावे दुसऱ्या एफआयआरमध्ये आहेत. राजस्थानमधील एक गट सन २०१०पासून, तर एक गट सन २०१३पासून निकालनिश्चिती करीत होता. हे सट्टेबाजांचे गट अनेकांना सामन्यावर सट्टा लावण्यासाठी भाग पाडत असत. त्यांनी बँकेत खातेही उघडले होते. त्यासाठी त्यांनी खोटी कागदपत्रे दिली होती. या सट्टेबाजीद्वारे मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग हवालाद्वारे परदेशातही दिला जात असे, असे एफआयआरमध्ये नमूद केले आहे.

सीबीआय चौकशी करीत असलेल्यांपैकी गुर्रम सतीशच्या नावावर २०१२ ते २०२० या आठ वर्षांत सहा बँक खात्यांमध्ये ४ कोटी ५५ लाख रुपये जमा झाले. त्याचवेळी त्याच्या परदेशी खात्यात ३ कोटी ५ लाख रुपये जमा झाले. गुर्रम वासूच्या नावावर ५ कोटी ३७ लाख रुपये जमा झाले. ही रक्कम कुठून आली, याचा नेमका तपशील त्यांनी दिला नाही. दरम्यान, सीबीआयला असे आढळून आले आहे की, दिलीप कुमार अनेक बँक खाती चालवत होता. ज्यात सन २०१३पासून ४३ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या देशांतर्गत रोख ठेवी जमा करण्यात आल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

राजस्थानमधील चार सट्टेबाज पाकिस्तानातील एका व्यक्तीच्या कायम संपर्कात होते. त्यापैकी सिंग याची युको बँकेत तीन खाती आहेत. त्यावर तीन भिन्न जन्मतारखा आहेत. या खात्याचा अभ्यास केल्यास तसेच उपलब्ध माहिती विचारात घेतल्यास २०१९च्या आयपीएलमधील निकाल निश्चित असल्याचे लक्षात येते, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *