महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ मे । यंदा वेळेआधी मान्सूम केरळमध्ये दाखल होणार असल्याने मागील दोन दिवसांपासून किनारपट्टी भागात पावसाची रिपरिप सुरु आहे. सलग झालेल्या पावसामुळे ऐन हंगामातील काही पिकांचे नुकसानही झाले आहे. मात्र आता पूर्वमोसमी पावसाने उसंत घेतली आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रापर्यंत प्रगती केलेल्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शनिवारी (२१ मे) मात्र दोन्ही समुद्रात कोणतीही प्रगती न करता विश्रांती घेतली. त्यामुळे महाराष्ट्रातही पूर्वमोसमी पावसाचा जोर कमी झाला आहे.
राज्यातील पुढील तीन-चार दिवस कोकण वगळता इतरत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परंतु असे असले तरी देशातील उत्तर आणि पूर्व भागातील राज्यांमध्ये पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिणेकडील केरळ आणि तमिळनाडूमधील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. कर्नाटकातही पाऊस सुरु आहे. राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही भागात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
शनिवारी तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. मात्र, दोन दिवसांच्या तुलनेत पूर्वमोसमी पावसाचा जोर ओसरला आहे. र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांची स्थिती अंदमानात १६ मे रोजी दाखल झालेले मोसमी वारे बंगालच्या उपसागरात एकदिवसाआड प्रगती करत आहेत. बंगालच्या उपसागरात तो १७, १९ मे रोजी जागेवरच होते. दुसरीकडे १६ ते १९ मे या कालावधीत अरबी समुद्राच्या बाजूने त्यांची प्रगती नव्हती. २१ मे रोजी मोसमी वाऱ्यांची कोणत्याही बाजूने प्रगती झाली नाही.
दरम्यान, महाराष्ट्रात अनेक भागात गेली दोन-तीन दिवस पूर्वमोसमी पाऊस झाला. सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कोरडे हवामान निर्माण होत आहे. पुढील तीन दिवस या तीनही विभागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही. या कालावधीत तापमानात किंचित वाढ होऊ शकते. कोकणात मात्र २५ मेपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात २५ मेनंतर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.