महाराष्ट्र २४- ऑनलाईन – नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. बीसीसीआयने देखील आयपीएलचा १३वा हंगाम १५ एप्रिलपर्यंत स्थगित केला होता. पण आता लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे आयपीएल लटकले आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत आयपीएलवर विचार देखील केला जाऊ शकत नाही.
एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना गांगुली म्हणाला, सध्या देशात जी परिस्थितीत आहे त्यामध्ये आयपीएल स्पर्धेचे आयोजन होणे अवघड आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली असून पण आताच काही सांगता येणार नाही. तसे पाहायला गेले तर सांगण्यासारखे काहीच नाही. विमानतळ बंद आहेत, लोक घरी आहेत, ऑफिस बंद आहेत, कोणीही बाहेर जाऊ शकत नाही. अशीच परिस्थितीत मे महिन्याच्या मध्यापर्यंत असेल.
भारतात सध्या जी परिस्थितीत आहे, ती खेळासाठी योग्य नाही. तुम्ही खेळाडूंना कोठून आणणार, खेळाडू प्रवास कसा करणार. जगभरात सर्व खेळ बंद आहेत अशात तुम्ही आयपीएल विसरून जा, असे गांगुली म्हणाला.
आयपीएलचे काय करायचे यासंदर्भात सोमवारी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर काही गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. जगात एक प्रकारचा सन्नाटा असताना खेळ कसा काय होऊ शकेल, असा सवाल गांगुलीने उपस्थित केला.