![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जून । अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर खलिस्तानी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खलिस्तानी फुटीरतावादी जर्नेल भिंद्रनवाले यांचे पोस्टरही झळकाण्यात आले. ३८ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी अमृतसरचे सुवर्ण मंदिर फुटीरतावाद्यांपासून मुक्त करण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन ब्लू स्टार संपले होते. ६ जून १९८४ रोजी उशिरा जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचा मृतदेह सापडल्यानंतर ऑपरेशन ब्लू स्टार बंद करण्यात आले. यामध्ये लष्कराचे ८३ जवान शहीद झाले. याशिवाय ४९२ लोकांचा मृत्यू झाला होता.
सोमवारी, ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्धापनदिनानिमित्त, अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर अनेक लोक जमले आणि त्यांनी खलिस्तान समर्थक घोषणा दिल्या. सर्व पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही शेकडो लोक सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. हातात तलवारी घेऊन त्यांनी खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी लोकांच्या हातात जर्नेल भिंद्रनवाले यांचे पोस्टर, बॅनर आणि छायाचित्रेही दिसून आली.
#WATCH | Punjab: A group of people gathers at the entrance to the Golden Temple in Amritsar, raises pro-Khalistan slogans and carries posters of Khalistani separatist Jarnail Bhindranwale. pic.twitter.com/zTu9ro7934
— ANI (@ANI) June 6, 2022
अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर लोकांची गर्दी जमली होती. लोकांनी खलिस्तान समर्थक घोषणा दिल्या आणि खलिस्तानी फुटीरतावादी जर्नेल भिंद्रनवाले यांचे पोस्टर-बॅनरही लावले. यावेळी लोकांनी सुवर्णमंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना गेटजवळ रोखण्यात आले.
‘ऑपरेशन ब्लूस्टार’ च्या वर्धापन दिनापूर्वी, रविवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सुवर्ण मंदिरात प्रार्थना केली आणि अकाल तख्तचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांच्यासोबत बैठक घेतली. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मान थेट जथेदारांच्या निवासस्थानी गेले. मान यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी जथेदारांच्या निवासस्थानातून बाहेर आल्यानंतर बैठकीदरम्यान झालेल्या संभाषणाची माहिती माध्यमांना दिली नाही.
६ जून रोजी मोठ्या संख्येने शीख यात्रेकरू अकाल तख्तवर पोहोचतील अशी अपेक्षा असल्याने शहरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यातील शांतता भंग करू देऊ नये, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असतानाही शेकडो लोक सुवर्ण मंदिराच्या मुख्य गेटवर पोहोचले.