मान्सून रेंगाळला ; राज्यात 12 जूननंतर येण्याचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जून । मान्सून कर्नाटकात दाखल झाल्यानंतर गोव्याच्या सीमेवर रेंगाळला असून राज्यात आता तो १२ ते १३ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी तो ७ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. सध्या विदर्भात उष्णतेची लाट सुरू असून गोंदियात सर्वाधिक ४५.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये आगामी पाच दिवस मान्सूनपूर्व पावसाचा जोर राहणार आहे. मध्य प्रदेशासह विदर्भात उष्णतेची लाट आहे. बिहार, आसाम आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा करावी लागत असून दोन ते तीन दिवसांत जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. सोमवारी मालेगाव तालुक्यात दुपारी काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.

असा आहे अंदाज

राज्यात जळगाव, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा नागपूर वेधशाळेने दिला आहे.

राज्यातील प्रमुख शहरांतील तापमान

गोंदिया ४५.८, ब्रह्मपुरी ४५.२, नागपूर ४५.१, वर्धा ४४.८, यवतमाळ ४३.५, जळगाव ४२.४, अमरावती ४२.०२, गडचिरोली ४२.०, अकोला ४२.०, नांदेड ४०.८, बुलडाणा ३८.८, सोलापूर ३७.६, औरंगाबाद ३७.२, नाशिक ३६.४, परभणी ३२.६,कोल्हापूर ३२.१, महाबळेश्वर २६.४.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *