महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ जून । भारतीय टीमची टी20 मालिकेतील खराब कामगिरी सुरूच आहे. दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या सामन्यात (IND vs SA) टीम इंडियाचा 4 विकेट्सनं पराभव केला. या विजयासह आफ्रिकेनं 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तर टीम इंडियासमोर घरच्या मैदानात मालिका गमावण्याच्या नामुश्कीचा धोका आहे. रविवारी कटकमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय टीमनं पहिल्यांदा बॅटींग करत 6 आऊट 148 रन केले. हेनरिच क्लासनेनच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं 149 रनचं लक्ष्य 19 व्या ओव्हरमध्येच पूर्ण केले. भारतीय टीमच्या पराभवाची हि कारणं आहेत.
# टीम इंडियानं चांगली सुरूवात केली. पण, 7 ते 14 ओव्हर्सच्या दरम्यान 4 विकेट्स गमावल्या. त्यामुळे बॅटर्स दबावात आले आणि टीमला मोठा स्कोअर करता आला नाही.
# दिनेश कार्तिकला अक्षर पटेलच्या नंतर 7 व्या क्रमांकावर बॅटींगला पाठवण्यात आलं. हा टीम मॅनेजमेंटचा चुकीचा निर्णय होता, अशी टीका माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानं स्टार स्पोर्ट्सवर बोलताना केली. टीम इंडियाचा माजी बॅटींग कोच संजय बांगर यानंही कार्तिकला अक्षरनंतर बॅटींगला पाठवण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. कार्तिकनं शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत 21 बॉलमध्ये नाबाद 30 रन केले.
# दक्षिण आफ्रिकेच्या फास्ट बॉलर्सचं टीम इंडियाकडे उत्तर नव्हतं. कागिसो रबाडानं 4 ओव्हर्समध्ये फक्त 15 रन देत 1 विकेट घेतली. वेन पार्नेललाही 23 रन देत 1 विकेट मिळाली. तर नॉर्कियाने 2 विकेट्स घेतल्या.
# टीम इंडियाला भुवनेश्वर कुमारनं चांगली सुरूवात करून दिली. भारतानं पहिल्या 6 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर बावुमा आणि क्लासनेन जोडी टिकली. स्पिनर्सना विकेट मिळाली नाही
# कटकमधील सामन्यात पाचवा बॉलर महाग पडला. अक्षर पटेलनं एक ओव्हरमध्ये 19 रन दिले. हार्दिक पांड्यानं 3 ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त इकोनॉमी रेटनं 31 रन दिले. लेग स्पिनर युजवेंद्र चहल तर आणखी महागडा ठरला. त्याच्या 4 ओव्हरमध्ये 49 रन निघाले.