महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ जून । देश व राज्य पातळीवर घडत असलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजात तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस सर्तक झाले असून, सायबर पोलिसांचे सोशल मीडियावर विशेष लक्ष आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
मागील काळात मंदिर व मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्दय़ावरून राज्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आता नूपुर शर्मा प्रकरणामुळे सोशल मीडियात पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. जिह्यातील संगमनेर तालुक्यात याप्रकरणी एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. मंगळवारी नगर शहरात एका युवकाने लाल किल्ला व तिरंगा ध्वजाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. बजरंग दलाने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे.
सोशल मीडियात अशा तणाव निर्माण करणाऱया प्रक्षोभक पोस्ट व्हायरल होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने आता यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सायबर सेलसह पोलीस ठाण्यामधील गोपनीय शाखांमार्फत त्यांच्या हद्दीतील हालचाली, सोशल मीडियातील पोस्ट आदींवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.
समाजात तेढ निर्माण होईल असे मेसेज व्हायरल झाल्याचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करताना, सोशल मीडियावर पोस्ट करताना खबरदारी घ्यावी. चुकीच्या पोस्ट फॉरवर्ड करू नये, असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.