राज्यभरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा : तोटा होत असल्याने कंपन्यांनी पुरवठा कमी केला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ जून । कच्च्या तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे, तर दुसरीकडे भारतात गेल्या ४ आठवड्यांत इंधन दरांत वाढ झालेली नाही. परिणामी इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असल्याने कंपन्यांनी पुरवठा कमी केला. त्यामुळे राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला. येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे.

औरंगाबादेत गुरुवारी (१६ जून) परिस्थिती आणखी बिकट झाली असल्याचे सचिव अखिल अब्बास यांनी सांगितले. अब्बास म्हणाले,‘पूर्वी शुक्रवारी ऑर्डर दिली, तर त्याच दिवशी उशिराने का होईना इंधन मिळत होते. आता शुक्रवारी ऑर्डर देऊन पूर्ण पैसे भरल्यावरही मंगळवारपर्यंत टँकर येत नाही.’ पेट्रोल फेडरेशनचे राज्य अध्यक्ष उदय लोध यांनी म्हटले की, ‘राज्यात सर्वत्र पेट्रोल-डिझेलचा तुटवडा कायम आहे. प्रत्येक पेट्रोल पंप आठवड्यात दोनदा-तीनदा काही तासांसाठी बंद ठेवण्याची वेळ येत आहे. तोटा होत असल्याने खासगी कंपन्यांचे पंप बंदच आहेत. त्यांनी वितरण पूर्ण बंद केले’

सोलापूर शहरात एकूण ४२ पेट्रोल पंप आहेत. दररोज साधारण एकूण ३ लाख लिटर पेट्रोलची दररोज विक्री होते. काही पेट्रोल पंपांवर पेट्रोलची कमतरता जाणवत आहे, मात्र ती परिणामकारक नाही. सरासरी पाहिले तर पेट्रोलच्या कमतरतेचे प्रमाण एक टक्का आहे, असे सोलापूर पेट्रोल असोसिएशन्स डीलरचे सदस्य योगेश चडचणकर यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात ४५५ तर शहरात ८० पेट्रोलपंप आहेत. त्यातील ३५ ते ४० टक्के पंप हे बीपीसीएलचे आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात इंधन पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या बैठका घेतल्यानंतर आता सर्वत्र पुरवठा सुरळीत झाला आहे. सध्या एचपीसीएलच्या पंपांबाबत पुरवठा कमी आहे. परंतु, त्यांची संख्या कमी असल्याने परिणाम जाणवत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *