महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । राज्यातील अभूतपूर्व राजकीय परिस्थितीत अद्यापही सुधारणा झालेली नाही. शिवसेनेचे दोन आमदार राज्यात परत आले आहेत. त्यांच्यासह शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. सर्व आमदारांची इच्छा असेल तर शिवसेना वेगळी भूमिका घेण्यास तयार आहे. मात्र त्यासाठी राज्यात परतून शिवसेना पक्षप्रमुखांसमोर तशी मागणी ठेवा. त्यांच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
सर्व आमदारांची इच्छा असेल की मविआतून शिवसेनेने बाहेर पडलं पाहिजे आणि वेगळा विचार केला पाहिजे तर त्यांनी मुंबईत यावं आणि अधिकृतपणे ही मागणी पक्षप्रमुखांपुढे करावी, पण आधी मुंबईत या, तिथून बसून पत्रव्यवहार करू नका. पक्के शिवसैनिक आहात, शिवसेना सोडणार नाही असं सांगतायत, मविआतून बाहेर पडायला शिवसेना तयार आहे, तुम्ही इथे येण्याची हिम्मत दाखवा. उद्धव साहेबांसमोर या आणि भूमिका मांडा, 24 तासात परत या, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.