आता शिंदेंसमोर शिल्लक राहिलाय फक्त एकच पर्याय ; पहा काय आहे कायदेतज्ज्ञांच मत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ जून । शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना आणि महाविकास आघाडीला अडचणीत आणलं आहे. गेल्या चार दिवसांपासून शिंदे आणि समर्थक आमदारांचा मुक्काम गुवाहाटीत आहे. शिवसेना आणि शिंदे गट यांच्याकडून कायदेशीर आणि तांत्रिक मुद्द्यांवर बॅटिंग सुरू आहे. एकमेकांना नियमांच्या कचाट्यात अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

माझ्यासोबत दोन तृतीयांश आमदार आहेत. त्यामुळे आमचा गट म्हणजेच शिवसेना असा दावा करत शिंदेंनी थेट पक्षावरच दावा केला. मात्र शिंदे गटाचा अभ्यास कमी पडत असल्याचं विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितलं. एखाद्या राजकीय पक्षात आपल्या गटाचं विलिनीकरण करण्याचा एकमेव पर्याय शिंदे गटासमोर असल्याचं कळसे म्हणाले. शिंदेंनी त्यांचा गट विलीन न केल्यास त्यांच्यासोबतचे सगळे आमदार अपात्र ठरतील, असं कळसेंनी म्हटलं.

पक्षांतरबंदी कायदा अतिशय स्पष्ट आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार, दोन-तृतीयांश आमदार एखाद्या पक्षातून फुटत असल्यास त्यांना स्वतंत्र गट करता येत नाही. त्यांना एखाद्या नोंदणीकृत पक्षात विलीन व्हावं लागेल. तसं न केल्यास ते अपात्र ठरतील, अशा शब्दांत कळसे यांनी नियम सांगितला.

माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनीदेखील हाच मुद्दा अधोरेखित केला. पक्षांतरबंदी कायद्यात झालेल्या सुधारणेनुसार, फूट पाडून तयार झालेल्या गटाला कोणतीही कायदेशीर वैधता नाही. त्यामुळे अशा गटासमोर एखाद्या राजकीय पक्षात विलीन होण्याचा पर्याय उरतो. स्वतंत्र गट स्थापन करण्याची तरतूद नसल्यानं आता विधानसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असेल, असं कोळसे पाटील यांनी सांगितलं.

पक्षांतरबंदी कायद्यानुसार शिंदे यांच्यापुढे केवळ विलिनीकरणाचा पर्याय असल्यानं आता शिंदे यांना भाजपमध्ये जावं लागेल किंवा प्रहार संघटनेचा पर्याय त्यांच्यासमोर आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानं म्हटलं. प्रहार ही बच्चू कडू यांची संघटना आहे. कडू हे ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री आहे. तेदेखील शिंदे यांच्यासोबत बंडात सहभागी आहेत. ‘आपल्याला भाजपसोबत जावं लागेल याची कल्पना शिंदे यांनी त्यांच्यासोबत बंड करणाऱ्या शिवसेना आमदारांना दिली नसावी, असं मला वाटतं. कारण भाजपमध्ये गेल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना आमदारांना अडचणी येतील,’ असं राष्ट्रवादीचा नेता म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *