महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ जून । शिवसेनेविरोधात बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांशी समेट होईल, अशी आशा शिवसेना शेवटच्या क्षणीही बाळगून आहे. उद्धव ठाकरे यांनी कालच बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा परत येण्याचे आवाहन केले होते. मात्र, दुसऱ्या बाजूला संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आमच्यावर खालच्या थराला जाऊन टीका करतात, असे सांगत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्र्यांनाच पेचात पकडले होते. शिंदे गटातील इतर शिवसेना आमदारही संजय राऊत यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टीकेवर नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे बुधवारी काहीशी मवाळ भूमिका घेताना दिसून आले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Floor test in Maharashtra Vidhansabha)
यावेळी बंडखोर आमदारांनी त्यांच्याविषयी उपस्थित केलेल्या नाराजीविषयी संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर संजय राऊत यांनी म्हटले की, ठीक आहे, मी आजपासून बोलायचं थांबतो. पण मी पक्षाची भूमिका आणि शिवसैनिक म्हणून कडवटपणे बोलत आहे.महाराष्ट्राचे तुकडे करण्याची योजना आहे, त्याविरोधात बोलत आहे. आता याचा त्यांना त्रास होत असेल तर ठीक आहे. एकनाथ शिंदे हे माझे निकटचे सहकारी आहेत, मित्र आहेत. मी काय आहे हे त्यांना माहिती आहे आणि ते काय आहेत, हे मला माहिती आहे.आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतात, असे म्हणून चालणार नाही. हे चुकीचं आहे. आदित्य ठाकरे हे पक्षाचे नेते आहेत, शिवसैनिकांचा उद्रेक झालाय,आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत बोलणारच, असे संजय राऊत यांनी म्हटले.