महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ जून । राज्याच्या विधानसभेचं एक दिवसाचं खास अधिवेशन गुरूवारी होणार आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारच्या भवितव्याचा फैसला होईल. मुख्यमंत्र्यांवरील अविश्वास दर्शक ठराव पास करण्यासाठी भाजपानं कंबर कसलीय. महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये चुरशीची लढत आहे. त्यामुळे प्रत्येक मत हे निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना फोन केला आहे. विधानसभेत मनसेचा 1 आमदार आहे. त्या आमदाराच्या पाठिंब्यासाठी फडणवीस यांनी राज यांना फोन केलाय.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेतली. सरकार अल्पमतात असल्याने निर्णयात हस्तक्षेप करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली होती.राज्यपालांना इमेलद्वारे आणि प्रत्यक्ष भाजपकडून पत्र देण्यात आले. या पत्रात राज्याच्या आताच्या परिस्थितीचा उल्लेख केला आहे. ‘शिवसेनेचे 39 आमदार बाहेर आहेत. त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं, असं विनंती करणारं पत्र राज्यपालांना देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख केला आहे. यावर राज्यपाल उचित निर्णय घेतील. अशी आम्हाला अपेक्षा आहे,’ असे मत भाजपाने व्यक्त केले होते. भाजपाच्या पत्रानंतर काही तासांमध्ये राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.