दोन दिवसांत मुसळधार पाऊस , किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा जोर वाढणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० जून । मुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सोसाटय़ाच्या वाऱयासह येत्या 48 तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असून यावेळी किनारपट्टीच्या भागात सोसाटय़ाचा वारा वाहणार आहे असा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबईत उद्याही आकाश ढगाळ राहणार असून मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील. मात्र उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबईसह राज्यात पावसाने ओढ दिली असल्यामुळे ग्रामीण भागात पेरण्यांना उशीर झाला आहे. या पेरण्या जुलै महिन्यापासून सुरू कराव्यात असे आवाहन आधीच करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबईसह राज्याला पाणीपुरवठा करणाऱया धरणांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला असताना मुंबईसह राज्यात आज पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली. मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अधूनमधून मध्यम आणि जोरदार सरी कोसळल्या, मात्र दुपारनंतर पाऊस थांबला. अधूनमधून लहान सरी कोसळत होत्या.

मुंबईसह कोकण, गोवा येथे पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात बऱयाच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडय़ात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मुंबईसह कोकण, गोव्यात एकूण पाच दिवस काही ठिकाणी पाऊस बरसणार आहे. 29 जून ते 3 जुलैपर्यंत अशा पाच दिवसांत मुसळधार पावसासह किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी या पाच दिवसांत किनारपट्टीच्या भागांत तूर्तास जाऊ नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *