महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ जुलै । भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची आज (शुक्रवार) ईडीकडून चौकशी होणार आहे. या चौकशीला हजर राहण्यापूर्वी राऊत पत्रकारांशी बोलत होते. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ईडीच्या कार्यलयाबाहेर येऊ नका, असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं. ईडीचा वापर राजकीय सोयीसाठी होत असल्याचा आरोप करत तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांच्या सरकारला राऊत यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. नव्या सरकारनं सुखाचा संसार करावा, त्यांना आमच्या शुभेच्छा. आम्ही सत्तेत असताना विरोधकांनी अडथळे निर्माण केले आम्ही तसं करणार नाही, असं राऊत यावेळी म्हणाले.शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं मी म्हणाणार नाही. शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचं होतं तर सध्य भाजपाचे खासदार असलेल्या नारायण राणेंना मुख्यमंत्री का केलं नाही? असा सवाल त्यांनी विचारला. शिवसेना फोडण्याचा भाजपाचा प्लॅन पूर्ण झाला. शिवसेनेच्या एका गटाच्या नेत्याला भाजपाने मुख्यमंत्री केलं. शिवैनिकाला मुख्यमंत्री केलं असं मी म्हणणार नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केले.