महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै ।२०१९ साली शिवसेना – भाजपाने एकत्र निवडणूक लढवल्या होत्या. राज्यातील जनतेने या युतीलाच कौल दिला होता. सेना-भाजपा एकत्र सत्ता स्थापन करावी अशीच लोकांची भावना होती. मात्र, त्यानंतरही आपण असंगाशी संग करत काँग्रेस राष्ट्रवादीशी धरोबा केला. लोकभावनेला पायदळी तुडवत असताना तेव्हा आपल्याला लाज वाटली नव्हती का?, असा सवाल शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून नेमणूक केलेल्या भरत गोगावले यांनी विचारला आहे.
पुढे बोलताना गोगावले यांनी, “आम्ही बाळासाहेबांचा हिंदूत्ववादी विचार लोकभावनेचा आदर करत सेना भाजपा युतीचे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आम्हाला ना त्याची लाज बाळगण्याची गरज आहे ना राजीनामा देण्याची,” असेही म्हटले आहे. दहिसर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांमध्ये आदित्य ठाकरे यांनी भाषण करताना शिवसेनेतील आमदारांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावर गोगावले यांनी हे उत्तर दिले आहे. यापूर्वी झालेल्या चूका टाळून आता तरी असंगाशी संग सोडा, असे आवाहनही त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी असणाऱ्यांबरोबरच शिवसेनेला केलं आहे.