![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै ।जून महिना पावसाशिवाय कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरुवातीपासून मात्र पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. या १५ ते २० दिवसांच्या कालावधीत राज्यातील विविध भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पुढील ४ ते ५ दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी अधूनमधून जोरदार सरीसह हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मेघराजा दमदार एंट्री करण्याची शक्यता आहे. (weather update maharashtra rain forcast imd)
मॉन्सूनची चाहूल लागताच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पावासाचा इशारा हवामान खात्यानं दिला होता. त्यानुसार राज्यात पावसाने जोरदार मुंसडी मारली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील नद्यांना पूर आले. पूरपरिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने अनेक ठिकाणी रेस्क्यु फोर्स आणि एनजीआरएफच्या तुकड्या पाठवल्या होत्या. मात्र आता पावसाचा जोर कमी झाला असल्याने नद्यांची पाणापातळी पुन्हा घटली आहे.
आता पुन्हा एकदा पुढील चार-पाच दिवस पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने राज्यभर अलर्ट जारी केला आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जून महिन्यातील पावसाचा संभाव्य अंदाजही वर्तवण्यात आला आहे. यामध्ये सामान्य किंवा सामान्य पाऊस भारताच्या वायव्य आणि मध्य भारतात पडेल तसेच असाच पाऊस उत्तर द्वीपकल्प, पूर्वेचा काही भाग आणि ईशान्येकडील काही भागांमध्येही होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या महिन्यातील पावसाने कोकण, मुबंई, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. पुण्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक पावसाची नोंद २०१४ मध्ये ५३.१ मिलिमीटर तर, त्याआधी १९६७ मध्ये ७१.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. पुढील चार दिवस शहरासह राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.