महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । देशातील बेरोजगारी आणि महागाईविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेसतर्फे आज देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवास्थानाला घेराव घालणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधीं, प्रियांका गांधीसह पक्षाचे अनेक नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला होता. मात्र हा मोर्चा पोलिसांनी रोखला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्रातही सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विधानभवन परिसरातून काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, मोहन जोशी, देवानंद पवार, प्रमोद मोरे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
राहुल गांधीची केंद्र सरकारवर टीका
“विरोधी पक्षांना पाठिंबा देणाऱ्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावली जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसून येत नाही. केंद्र सरकारविरोधात जेवढं मी बोलेन तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल. पण मी कारवाईला घाबरत नाही. जो धमकावतो तोच घाबरतो. हे लोक २४ तास खोटं बोलण्याचे काम करतात. त्यांना महागाई आणि बेरोजगारीसोबत दिलेल्या आश्वसानाचीही भीती वाटत” असल्याची टीका राहूल गांधींनी केली