महाराष्ट्र 24 । मुंबई : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी भारतात सध्या दुसरा लॉकडाऊन सुरु आहे. सुरुवातीला 14 एप्रिल पर्यंत 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर देशातली कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन हा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला. मात्र जगातील आघाडीचे मेडिकल जर्नल Lancet चे एडिटर इन चीफ रिचर्ड हॉर्टन यांनी एवढा लॉकडाऊन भारताला पुरेसा नसल्याचं म्हटलं आहे.
रिचर्ड यांनी म्हटलं की, भारताने लॉकडाऊन हटवण्याची घाई करू नये. एकूण दहा आठवडे लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताच्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मे रोजी संपणार आहे. 3 मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व सुरळीत होईल अशी लोकांना आशा वाटते. मात्र इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना रिचर्ड यांनी हा लॉकडाऊन हटवण्याची घाई करू नये असा सल्ला दिला आहे.
भारतात कमीत कमी दहा आठवडे लॉकडाऊन करण्यावर विचार करायला हवा. कोणत्याही देशातून कोरोना व्हायरस कायमचा नष्ट होणार नाही. तो आपला आपण नष्ट होईल. देशात कोरोनाला रोखण्यासाठी योग्य दिशेनं पावलं टाकली जात आहेत असंही रिचर्ड यांनी सांगितलं.