महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट । भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये मित्रपक्षांना सातत्याने संपवण्याचे काम केले आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस ( यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. बिहारमध्ये भाजपचे ७५ लोक निवडून आले होते. तर संयुक्त जनता दलाचे (JDU) ४२ आमदार निवडून आले होते. तरीही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे भाजप मित्रपक्षांना कधीही धोका देत नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. महाराष्ट्रात शिवसेना आमच्यासोबत होती. पण त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे खरी शिवसेना आमच्यासोबत आली. आता शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. त्यांच्यासोबत ५० आमदार आहेत. तरीही भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यामध्ये त्यांच्या आणि आमच्या प्रत्येकी ९-९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे मला असं वाटतं की, पवार साहेबांचे दु:ख वेगळे आहे. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.