महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । आज पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं. या रक्षाबंधनानंतर त्यांच्याशी बातचीत करताना त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे जाहीर केली. वरीष्ठ नेत्यांना माझी पात्रता वाटत नसेल म्हणून मला मंत्रीपद दिलं नसेल असा थेट टोला त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लगावला आहे.
माझी पात्रता वाटत नसेल..
याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ज्यावेळेस मंत्रिमंडळ बनत असतं त्यावेळेस सर्वांना समाधानी करणं शक्य नसतं. त्यामुळे जे मंत्री झाले त्यांनी तरी लोकांचा समाधान करावं अशा शुभेच्छा मी नव्या मंत्र्यांना देऊन झालेली आहेत. तसेच मी चर्चेत राहणारच नाव आहे, मात्र अजून त्यांना माझी पात्रता वाटत नसेल, त्यामुळे मला मंत्रीपद दिलं नसेल, जेव्हा त्यांना माझी पात्रता वाटेल तेव्हा देतीलही कदाचित, त्याबद्दल मला काही अपक्षेप नाही, या चर्चा मीडियातून होतात आणि कार्यकर्त्यातून होतात अशी प्रतिक्रिया यावेळी पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदावरती दिलेली आहे.
मंत्रिमंडळात महिला असल्याच पाहिजेत
तसेच नव्या मंत्रिमंडळात महिला या असल्याच पाहिजेत, माझं सांगणं आहे की महिला म्हणजे महिला बालकल्याण, एखादा मुस्लिम बांधव म्हणजे, अल्पसंख्यांक, आदिवासी भागातून म्हटल्यावर आदिवासी विकास, शेड्युल कास्ट म्हणजे शेड्युल कास्ट खातं असं करू नये, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तसेच मला कौतुक वाटतं की मागच्या मंत्रिमंडळात मी महिला असूनही मला ग्रामविकास खातं मिळालं होतं. अशा रितीनेच महिलांना संधी दिली पाहिजे, अशी अपेक्षा मी या मंत्रिमंडळाकडून व्यक्त करते, असे त्या म्हणाले आहेत.