![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । कोकणात हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी एक संशयास्पद बोट आढळून आली. या बोटीत AK 47 सह शस्त्रास्त्रं सापडल्याने खळबळ उडाली. या घटनेमुळे आता राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड मुंबईसह पुण्यात हाय अलर्ट जारी केला गेला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये नाकाबंदीही करण्यात आली आहे.
दहीहंडीच्या उत्सावादरम्यान खबरदारीच्या उपाययोजना म्हणून योग्य ती काळजी घेतली जात आहे. दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यशील आहेत. सर्व हॉटेल, लॉज, धर्मशाळा तसंच महत्वाच्या आस्थापना आणि संवेदनशील ठिकाणांची कसून तपासणी केली जात आहे. यासोबतच पंचतारांकित हॉटेल्सच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. मुंबई पोलिसांनी शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना दिल्या आहेत.
याचबरोबर आज सकाळपासून हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावरही कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडल्याने तिथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गस्तीसाठी काही पोलिसांना तिथे तैनात करण्यात आले आहे. काल सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तीन एके-47 रायफल असलेली एक संशयास्पद बोट जप्त केली. यानंतर राज्यातील प्रमुखांनी याबाबत खुलासे केले. हे सर्व प्रकरण महाराष्ट्र ATS कडे देण्यात आलं आहे. याप्रकरणाची तपासणी आता महाराष्ट्र एटीएस करत आहे.
रायगडच्या हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर एक बोट दुर्घटना अवस्थेत सापडली आहे. या बोटीत 3 AK-47 आणि काडतुसं सापडली. या बोटीचं नाव लेडी हान आहे, तसंच ही बोट ऑस्ट्रेलियन आहे. ऑस्ट्रेलियन महिलेची ही बोट असून या बोटचा कॅप्टन महिलेचाच नवरा आहे. एका कोरियन युद्ध नौकेने त्याला मदत केली आहे. ही बोट मस्कतवरून युरोपला जात होती, असं फडणवीस म्हणाले.
26 जूनला या बोटीचं इंजिन निकामी झालं त्यानंतर कोरियन युद्धनौकेनं त्यांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले. समुद्र खवळला असल्याने बोटीचे टोईंग करता आले नाही. समुद्रातल्या अंतर्गत प्रवाहामुळे ही नौका भरकटत हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली.