महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी। आकाश शेळके । बीड (अंबाजोगाई ) : लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे अर्थिक घडी विस्कटली आहे. अवकाळी पावसाने रब्बीच्या पिकावरही संकट कोसळले. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना मोफत खत व बियांचा पुरवठा खरीप हंगामासाठी करावा अशी मागणी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.मागील चार वर्षांत दुष्काळ, गारपीट, वादळी वारे व आता कोरोनाचा फटका यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. गेल्यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप गेले. परतीचा पाऊस चांगला झाल्याने रब्बी हंगाम झाला. मात्र, गेल्या महिनाभरात सततची गारपीट व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, ज्वारी, कापूस, टरबूज, आंबे व फळभाज्या व पालेभाज्या अशा पिकांचे नुकसान झाले.
यंदा शासनातर्फे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बीचा पीकविमाही भरून घेतला नाही. त्यामुळे झालेल्या नुकसानीची दाद प्रशासनाकडे मागायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकाच्या नुकसानीचे पंचनामेही झाले, परंतू नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही मंजूर झाली नाही.
केज मतदारसंघात वर्षभरापासून अनेक गावातील पीकविम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. अशा पस्थितितून शेतकऱ्यांना सावरण्यास खरीपासाठी खते व बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.