महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ६ सप्टेंबर । शिवसेना पक्षसंघटनेवरील नियंत्रणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची राजकीय ओळख असलेला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचे प्रस्थापित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने घेतला आहे. त्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबरोबरच भाजपकडून रसद मिळावी, यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचं समजत आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं होतं. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेही उपस्थित असतील यासंबंधी तर्क-वितर्क लढवले जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना यावर भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या आधी आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक घेत दसरा मेळावा घेण्याचा मानस व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आपणच आहोत व आपणच शिवसेना असल्याने दसरा मेळावा घेण्याचा विचार त्यांनी मांडला. तसंच यासाठी तयारीला लागण्याचा आदेश सर्व आमदार, पदाधिकाऱ्यांना दिला. गणेशोत्सव संपल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकृत घोषणा करतील, असेही त्यावेळी ठरलं.
एकनाथ शिंदे – राज ठाकरे भेट
१ सप्टेंबरला गणपती दर्शनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. ‘‘ही भेट गणेश दर्शनासाठी होती. पण, राज यांच्याबरोबर आमचे जुने संबंध आहेत. त्यांनी आम्हाला सरकार स्थापन करण्यातही राजकीय सहकार्य केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला कोणाकोणाला बोलावण्यात येईल, हे आताच सांगता येणार नाही. गणेशोत्सवानंतर याबाबत काही निर्णय होण्याची शक्यता आहे. स्थळही त्याच वेळी अंतिम होईल’’, असं शिंदे गटाच्या एका आमदाराने शिंदे-ठाकरे भेटीनंतर सांगितलं.
दसरा मेळाव्याला राज ठाकरेंना बोलावणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “जेव्हा हे सरकार स्थापन होत होतं, तेव्हाही अनेक चर्चा होत होत्या. काही बातम्या आल्या की अनेक लोकांच्या पोटात गोळा यायचा. हीदेखील चर्चा आहे. अजून गणपती विसर्जन झालेलं नाही, त्यानंतर पितृ पंधरवडा, नवरात्री आणि नंतर दसरा आहे. सगळं आताच कसं काय सांगणार? त्याला फार अवधी आहे. मधल्या काळात अनेक गोष्टी होत असतात”.