महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । मुंबई ।करोनाचा संसर्ग झाल्यानंतर उशिरा वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचेही प्रमाणही मोठे आहे, अत्यवस्थ अवस्थेमध्ये असलेल्या या रुग्णांना तातडीने दाखल करून घेण्याची गरज असते. त्यामुळे पालिकेने ‘स्टेप डाउन पॉलिसी’ तयार केली आहे. या पॉलिसीमध्ये करोनाचा संसर्ग झालेल्या, मात्र लक्षणे दिसत नसलेल्या तसेच सौम्य प्रकारची लक्षणे असलेल्या रुग्णांचे विलगीकरण केले असेल तर पाच दिवसांनी त्यांना घरी पाठवण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे. घरी जाताना त्यांच्या हातावर पुढील किती दिवस घरात राहायचे आहे, याचा शिक्का हातावर मारण्यात येणार आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला घरी गेल्यानंतर विलगीकरणाची मुदत संपेपर्यंत घरामध्ये राहावे लागणार आहे.
लक्षणे दिसत नसलेल्या मात्र करोना पॉझिटिव्ह असलेल्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे त्यांना १४ दिवसांपर्यंत रुग्णालय, विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यापेक्षा पहिले पाच दिवस वैद्यकीय निगराणीखाली ठेवून हातावर शिक्का मारून घरी पाठवण्याच्या दृष्टीने विचार सुरू असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या मर्यादित असल्यामुळे प्रकृती खराब झालेल्या स्थितीमध्ये येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला माघारी पाठवावे लागू नये, लक्षणे असलेल्या वा संपर्कात आलेल्या व्यक्तीलाही तातडीने विलगीकरणाची सुविधा मिळावी यासाठी या प्रकारे ‘अर्ली स्टेप डाऊन पॉलिसी’च्या दृष्टीने विचार सुरू आहे.