महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ८ सप्टेंबर । महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 18 जिल्ह्यांमधील ग्रामपंतायतींसाठी मोठी घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील 1 हजार 166 ग्रामपंतायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या 1 हजार 166 ग्रामपंतायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच 14 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे 24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर 2022 होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.