![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ सप्टेंबर । गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असताना आता गणपतीला निरोप देण्याचे वेध लागले आहे. मंडळांकडून विसर्जन मिरवणूक रथ तयारीला वेग आला आहे. पण याच वेळी शहर स्वच्छ राहिले पाहिजे, कचरा लगेच उचलला जावा यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने क्षेत्रीय कार्यालयांशी समन्वय साधून विसर्जन मिरवणूक संपताच पुढच्या तीन-चार तासात शहर चकाचक करण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. त्याचप्रमाणे विसर्जनाच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नदीकाठी अग्निशामक दलाची यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
कोरोनामुळे दोन वर्षे अतिशय साधेपणाने व मिरवणुकांशिवाय गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पण यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणपतीचे दर्शन व देखावे पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. शहरात खाद्यपदार्थ विक्री, खेळण्यांसह इतर साहित्य विक्रीचे स्टॉल लागलेले आहे. विसर्जन मिरवणुकीच्या वेळेत तर याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पेठांमधील सर्वच रस्त्यांवर कचरा पडलेला असोत. विसर्जन मिरवणुकीला लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकापासून ते टिळक चौकापर्यंत दुतर्फा भाविकांची प्रचंड गर्दी झालेली असते. त्यात ढकला ढकली होते. या गोंधळात अनेकांच्या चपला, बूट तुटतात, त्याचाही कचरा दरवर्षी निघत असतो. तसेच मिरवणुकीत उधळलेला गुलाल, फुले, रांगोळी असा कचरा निर्माण होतो. त्यामुळे महापालिकेला सर्व रस्ते झाडून घ्यावे लागतात.
असे आहे नियोजन
पुणे महापालिकेचे मध्यवर्ती भागासाठी १३०० कर्मचारी
आदर पूनावाला फाउंडेशन, जनवाणी यांसह इतर संस्थाचा सहभाग
याच भागात २१० फिरती स्वच्छतागृहे ठेवली आहेत
शहराच्या इतर भागात क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर नियोजन
त्यामध्ये ७ हजार ७०० कर्मचारी असणार
ज्या भागातील गणेश विसर्जन मिरवणूक जसजशी पुढे जाईल, तसे लगेच स्वच्छतेचे काम सुरू होणार