महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ सप्टेंबर । भाजपच्या वाटेवर, शिंदे गटाच्या मार्गावर अशी चर्चा असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. येत्या १७ सप्टेंबरपासून मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू होत असून, या ऐतिहासिक वर्षाला प्रारंभ करताना १६ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबाद येथे घ्यावी, असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. परंतु विद्यमान स्थगिती सरकारने हा निर्णयसुद्धा स्थगित केल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. गेले दोन महिने राज्य सरकारबद्दल अवाक्षर न काढणाऱ्या या नेत्याने जोरदार टीका करून काँग्रेसमध्येच राहण्याचे संकेत दिले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
२० जून रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानानंतर चव्हाण यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेल्या आठवड्यात झालेल्या स्नेहभोजनात तर ते शिंदे गटात प्रवेशासाठीही तयार असल्याचे म्हटले गेले. पण त्यांनी तो विचार बदलला असे त्यांच्या सोमवारच्या टीकेवरून लक्षात येते. ते म्हणाले की, मुक्तिसंग्रामाच्या ७५ व्या वर्षानिमित्त १६ सप्टेंबर रोजी औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी. मराठवाड्यातील प्रलंबित विकास कामांना गती द्यावी, अशी सूचना मी स्वतः महाविकास आघाडी सरकार असताना सूचना मांडली होती. त्याला अमित देशमुख, वर्षा गायकवाड आदी समिती सदस्यांनी अनुमोदन दिले होते.