महाराष्ट्र २४ ऑनलाईन – मुंबई- विशेष प्रतिनिधी -: देशातील लॉकडाऊन संपायला अवघे तीन दिवस शिल्लक असतानाही कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे १७१८ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने ३३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत १०७४ लोकांनी जीव गमावला आहे. ३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला (पिक पॉईंट) पोहोचेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
येत्या ३ मे रोजी देशातील लॉकडाऊनचा कालावधी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी परराज्यांमध्ये अडकून पडलेले मजूर, विद्यार्थी आणि पर्यटकांना पुन्हा आपापल्या राज्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने सशर्त मंजुरी दिली आहे. मात्र, नागरिकांच्या या आदानप्रदानासाठी दोन्ही राज्यांची परवानगी आवश्यक असेल. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या लोकांनाच इतर राज्यांमध्ये पाठवले जाईल. तसेच निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) केलेल्या बसमधून लोकांची वाहतूक व्हावी, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.