महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१ ऑक्टोबर । राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार काही भागात पाऊस झाला आहे. पुणे, मुंबईसह ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतुकीवर परिणामही झाला होता. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे चार दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांमध्ये मोसमी पावसाचा हंगाम संपत असतानाच राज्यात सरासरीच्या तुलनेत 23 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस झाला असताना, मुंबई शहरासह कोकण विभागात अनेक भागांत सरासरीच्या तुलनेत आणि दरवर्षीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मात्र, राज्याच्या सर्वच विभागांतील धरणांमध्ये यंदा 90 टक्क्यांहून अधिक आणि समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे.
गेल्या वर्षी मुंबईसह कोकण विभागात जास्त पाऊस झाला होता. मुंबई, पालघरने आघाडी घेत सरासरीच्या तुलनेत २० टक्के अधिक पावसाची नोंद केली होती. मात्र यंदा मुंबई शहरात पावसाची सरासरी पूर्ण झालेली नाही. विदर्भात सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के अधिक, मध्य महाराष्ट्रात २६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मराठवाडय़ातही सरासरीपेक्षा २४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.