महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ ऑक्टोबर । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. माजी मुख्यमंत्र्यांनी पाऊण तासाच्या भाषणात हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंची अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी मशिदींना भेट दिल्याच्या मुद्द्यापासून ते नामांतरणापर्यंतचे मुद्द्यांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. उद्धव यांच्या या भाषणावर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे.
उद्धव यांच्या भाषणानंतर लगेचच ट्वीटरवरुन “नुसतीच ‘उणी’ ‘धुणी’ ‘नळ’ आणि ‘भांडण’; विचार ही नाही आणि सोनं ही नाही,” असं ट्वीट देशपांडे यांनी केलं आहे. दरम्यान एकीकडे उद्धव ठाकरेंचं भाषण सुरु असताना दुसरीकडे वांद्रे कुर्ला संकुलामधील एमएमआरडीच्या मैदानामधील एकनाथ शिंदेंच्या सभेमध्ये शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी राज ठाकरे हे शिवसेना सोडून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या घरावर मोर्चा नेण्याचे, त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याचे, त्यांना शिव्या देण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले होते असा खळबळजनक दावा केला आहे.
शिवसेना सोडून गेलेल्या छगन भुजबळ आणि नारायण राणेंबद्दलही असाच प्रकार झाल्याचा दावा शेवाळेंनी आपल्या भाषणा केले आहे. मात्र राज यांच्याबद्दलच्या या दाव्यावर मनसेकडून अद्याप प्रतिक्रिया नोंदवण्यात आलेली नाही.