महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ ऑक्टोबर । राज्यात इयत्ता आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा तिसरीपासून परीक्षा सुरू केली जाणार असल्याचे सूतोवाच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. याबाबत राज्यातील शिक्षणतज्ञांची चर्चा सुरू असून, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी तिसरीपासून परीक्षा सुरू करण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी ही माहिती दिली.
केसरकर म्हणाले, आठवीपर्यंत परीक्षा घेतल्या जात नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत त्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. त्या पार्श्वभूमीवर इयत्ता तिसरीपासून पुन्हा परीक्षा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. परीक्षा घेतली तरी आम्ही मुलांना अनुत्तीर्ण करणार, असा त्याचा अर्थ काढण्यात येऊ नये असेही ते म्हणाले. वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याआधी तेथील विद्यार्थी आणि अतिरिक्त शिक्षक यांची माहिती घेतली जाईल. त्यानंतरच तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय होईल. विद्यार्थ्यांनी अमुक एका ठिकाणी शिक्षण घेतले तरच त्यांची गुणवत्ता वाढते असे नाही. त्यामुळे त्यांच्या शाळा बंद झाल्या तरी आसपासच्या शाळेत त्यांचे समायोजन होईल, असेही केसरकर म्हणाले.