आज पासून राज्यातून मान्सून परतणार ; आजचा दिवसच राज्याच्या काही भागांत पाऊस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० ऑक्टोबर । गेल्या चार महिन्यांपासून जोरदार बरसत असलेल्या पावसाला नागरिक कंटाळले आहेत. त्यांच्यासाठी ‘गुड न्यूज’ असून, आता हा मान्सून अखेर गुरुवारी संपूर्ण राज्यातून परतणार आहे, अशी घोषणा हवामान विभागाने मंगळवारी केली. देशासह राज्यात गेल्या साडेतीन ते चार महिन्यांपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सर्वच भागांत जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मोठी वित्तहानी झाली. नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आता मात्र हा पाऊस पूर्णपणे कमी होणार असून, गुरुवारी महाराष्ट्रातून परतीचा प्रवास करणार आहे. त्यामुळे राज्यातील पाऊस 20 ऑक्टोबरपासून पूर्णपणे कमी होणार आहे, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

राज्यातून 48 तासांत मान्सून परतीस निघणार
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालसह महाराष्ट्रातून आगामी 48 तासांत म्हणजेच 20 ऑक्टोबरला (गुरुवारी) राज्यातील पाऊस पूर्णपणे कमी होणार आहे. अरबी समुद्राच्या मध्य भागापासून महाराष्ट्रापर्यंत चक्रीय स्थिती, तसेच वायव्य अरबी समुद्र ते केरळ आणि पुढे महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या दोन स्थितीमुळे राज्याकडे बाष्प आणि वारे वाहत आहेत. त्यामुळेच पावसाने धुमाकूळ घातला आहे.

चक्रीवादळाचे संकेत, राज्यावर परिणाम नाही
बंगालच्या उपसागरातील उत्तर अंदमानात 20 ऑक्टोबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन 22 ऑक्टोबर रोजी त्याचे रूपांतर
अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. त्यामुळे 26 व 27 ऑक्टोबरदरम्यान त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा परिणाम राज्यावर होण्याची शक्यता नाही, अशी माहिती सेवानिवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *