महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ नोव्हेंबर । सरकारी रेशनचा अवैध लाभ घेत आहेत, अशा देशभरातील 10 लाख लोकांच्या बनावट शिधापत्रिका रद्द होणार आहेत. लवकरच या शिधापत्रिकांवरील रेशनवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. बनावट शिधापत्रिकाधारकांनी घेतलेल्या रेशनपोटी सरकारकडून वसुलीही करण्यात येणार आहे.
सध्या देशभरातील 80 कोटींहून अधिक लोक मोफत रेशनचा लाभ घेत आहेत; पण या सुविधेला पात्र नसलेले लोकही लाभ उपटत आहेत. अपात्र असताना वर्षानुवर्षे रेशन सुविधेचाही लाभ घेत आहेत. अलीकडेच सरकारने 10 लाख अपात्र शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवली आहे. या शिधापत्रिकाधारकांना यापुढे गहू, हरभरा आणि तांदूळ मोफत मिळणार नाही. अपात्र शिधापत्रिकाधारकांची यादी सरकारला पाठवावी, असे आदेश शिधावाटप विक्रेत्यांना देण्यात आले आहेत. रेशन विक्रेते ही यादी तसेच संबंधित कार्डधारक अपात्र का आहे, त्याचा अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवतील. नंतर त्यांची कार्डे रद्द केली जातील. मोफत रेशन मिळण्यास पात्र असलेल्यांनाच रेशन मिळेल.
अपात्र कार्डधारकांत कोण?
जे कार्डधारक आयकर भरतात, ज्यांच्याकडे 10 बिघ्यांपेक्षा जास्त जमीन आहे, अशा लोकांची यादीही तयार केली जात आहे.
गेल्या चार महिन्यांत मोफत रेशन घेतलेले नाही, अशा लोकांचाही या यादीत समावेश आहे.