पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात आंदोलन करणाऱ्या रिक्षा संघटनांना दणका; पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ नोव्हेंबर । रॅपिडो बाईक टॅक्सीविरोधात रिक्षा संघटनांनी पुणे आरटीओ कार्यालयाबाहेर केलेल्या ठिय्या आंदोलनाविरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होतं. या आंदोलनामध्ये आरटीओ कार्यालयाच्या रस्त्यावर रिक्षा संघटनेकडून चक्काजाम करण्यात आला होता. वाहतुकीचा बोजवारा उडवल्यामुळे आंदोलनकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाईक टॅक्सी रॅपिड ॲपमुळे रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचं सांगत रिक्षा संघटना आक्रमक झाल्या होत्या. याबाबत रिक्षा संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देखील दिले होते. हे ॲप बंद करण्याची रिक्षा संघटनांची मागणी होती. या विरोधात त्यांनी काल २८ नोव्हेंबरला पुणे आरटीओ कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. याप्रकरणी रिक्षा संघटनेचे केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी ‘रिक्षा बंद’चा फटका नागरिकांना सोमवारी बसला. ‘पीएमपी’ने अतिरिक्त १०० गाड्या सोडल्या, तरी त्या खचाखच भरून येत होत्या. नागरिकांना प्रवासासाठी वाहन न मिळाल्यामुळे बराच वेळ ताटकळत थांबावे लागले. काही ठिकाणी खासगी वाहनचालकांकडून जास्त पैसे आकारल्याच्या घटना घडल्या. या रिक्षा बंद आंदोलनात काही संघटनांनी भाग घेतला नसला, तरी त्यांनी भीतीने रिक्षा सुरू ठेवल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यावर खूपच कमी रिक्षा दिसत होत्या.

रिक्षा बंदमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. बाइक टॅक्सी बंद व्हावी, रिक्षा परमिट बंद करावे, अशा विविध मागण्यांसाठी रिक्षा संघटनांकडून बेमुदत रिक्षा बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, बाहेरगावी जाणारे व येणारे प्रवासी यांना बसला. अनेकांनी पीएमपी बसचा आधार घेतला; पण सकाळी पीएमपी बसमध्ये गर्दी असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले; तसेच परराज्यांतून आणि जिल्ह्यातून रेल्वेने आलेल्या नागरिकांना रेल्वे स्थानकावर रिक्षा आणि कॅब नसल्यामुळे तासन् तास ताटकळत उभे राहावे लागत होते. ओला आणि उबेर रिक्षाचालकांनीदेखील बंदमध्ये सहभाग घेतल्यामुळे प्रवाशांना खासगी कॅब शिवाय पर्याय नव्हता; पण कॅबलाही जास्त मागणी असल्यामुळे कॅबही उपलब्ध होत नव्हत्या.

या आंदोलनातून काही रिक्षा संघटनांनी माघार घेतली होती; पण रिक्षाचालकांना दमदाटी करून रिक्षा फोडल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी प्रवाशांना रिक्षातून उतरवून देण्यात आल्याच्या घटना घडल्या. रिक्षा बंद असल्यामुळे पीएमपीच्या बसमध्ये मोठी गर्दी होती. सोमवारी विवाहाची तारीख असल्यामुळे अनेकजण बाहेरून आले होते. त्यांनादेखील रिक्षा बंदचा फटका बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *